कधी कधी साध्या गप्पा अन गंमत करता करता जेव्हा तुमच्या लक्षात येत की दोस्ती मध्ये कुस्ती झाली अशा वेळी फक्त माघार घेणं किंवा लेकराला मूळ मुद्द्यापासून दूर करणं हाच एकमेव पर्याय असतो.
दोनेक आठवड्यापूर्वी मी,पर्णवी अन आई आम्ही भाजी घेण्यासाठी मंडई ला गेलो होतो. आई ला भाजी घ्यायला सोडलं अन मग आम्ही दोघे गप्पा मारायला मोकळे झालो.रायगड ट्रेक ची अर्धी राहिलेली गोष्ट पूर्ण करायची होती म्हणून मग त्यावरून आमच्या गप्पा सुरू झाल्या.आता खूप सारे काका लोक आहेत मग कधी कधी मग तिचा गोंधळ होतो.
बाबू.....अरे हेमंत काका ,सचिन काका अन तू सोबत राहायचा ना मग धनु काका का नव्हता? इथून मग जे सुरू झालं त्यात रायगड मागे पडला अन वेगळ्याच गडावर आमची लढाई सुरू झाली.
मग माझ्या लहानपणी चा विषय निघाला.नुकतीच ती गावाकडं गेली होती तेव्हा जवळ असलेल्या डोंगरावर फिरायला गेले होते.तर त्यावरून पण ऐकवलं लगेच...मी तर बघ ज्यु.केजी लाच आहे तर उंच डोंगरावर एकटी चढले तू तरी चढला होता का?
आता बाबा पण काय कमी आहे होय...माघार कशाला घेणार...सांगून दिलं...हो मग....मी,आत्तु ,आजी अन आजोबा आम्ही जायचो तेव्हा मी पण एकटा डोंगरावर जायचो.एवढं काय बोललो तेच लगेच प्रतिक्रिया आली.
"बाबू....तुला पण माझ्या सारखं लहानपणीच आठवत की" 🙈
यातून सावरतोय तोच पुढचा बॉम्ब पडला.
"बाबू....तुझ्या लहानपणी तेव्हा मी कुठे होते रे ...मला नव्हतं ना नेलं तेव्हा....असच करायचा ना तू."
"अरे बच्चा तू नव्हता तेव्हा..." माझा आपला सावरायचा वेडा वाकडा प्रयत्न सुरू झाला तोच पुढील प्रश्न..
"आऊ कुठे होती तेव्हा...तिला पण नाही नेलं ना.."
आता हिला नीट समजावं म्हणून मी आपला सुरू झालो...
"चिकू....अरे तेव्हा आम्ही लहान होतो ना त्यामुळे आम्ही तेव्हा भेटलो नाही....मग मोठे झालो ना त्यानंतर मी आणि आऊ भेटलो...मग आमचं लग्न झालं अन मग तू आलीस....अगदी असंच आजी आजोबा लहान होते तेव्हा मी नव्हतो...मग ते मोठे झाले...त्यांच लग्न झालं अन मी आलो..."
हुश्श...मला वाटलं सुटलो एकदाचा...पण कसलं काय..
"मग बाबू माझं लग्न कधी होणार रे...."😂😂😂
"अरे बच्चा...तू अजून लहान आहे...मोठा झाला ना तू की मग बघू"
"असंच करणार ना तू...नको करुस माझं लग्न...तू ,आऊ ,आजी,आजोबा सगळ्यांनी लग्न केलं...माझंच कोणी लग्न करत नाही....मी छोटू आहे ना अस करणार ना तू...मी नाही बोलणार तुझ्याशी....कट्टी आता...असंच करतो तू..." 😂😂🤣🤣🤣
अस म्हणून रागावून नाक फुगवून बसलेलं निरागस पिल्लू बघताना माझी हसून पुरेवाट झाली होती पण परिस्थिती बिघडू नये उगाचंच हसू दाबून ठेवलं होत....मग हळूच खाण्यावर विषय नेला अन All matter settled. एकदा खाऊगिरी सुरु झाल्यावर मग बाकी सगळं विसरून पाव भाजी,डोसा,आईस्क्रीम काय काय बाकी आहे याचा हिशोब झाला बाकी काही नाही.😂😂😂😂