काल संध्याकाळी सुंदर असा संधीप्रकाश पडला होता सोबतच मस्त थंड हवा होती.अचानक मूड बदलला अन म्हणलं चला चक्कर मारावी.चिल्लर मंडळी पण घरात बसून कंटाळून गेली होती,त्यांना पण घेऊन जाऊ या अस ठरवलं. त्यामुळे पर्णवी अन अद्वय दोघांना म्हणलं पटकन हात पाय धुवून घ्या, बाप्पा करा मग आपण बाहेर फिरायला जाऊ या. बाहेर जायचं म्हणल्यावर दोघे पण एकदम फॉर्म मध्ये आले.पर्णवी ने चटकन आवरून शुभंकरोती,गायत्री मंत्र वगैरे म्हणून मास्क लावून तयार पण झाली मात्र अद्वय ची गाडी गणपती स्तोत्र की शुभंकरोती यावर अडकली होती शेवटी गणपती स्तोत्र वर मॅटर सेटल झालं🤣😀
सोसायटीच्या बाहेर पडतो न पडतो तेच दोन्ही तोफा धडाधडायला सुरुवात झाली, अखंड प्रश्न सुरू.....मामा, तू पर्णवी च ऐकतो माझं ऐकतच नाही माझं पण ऐक.... बाबा, आता तूला माझं ऐकावं लागेल.अस दोन्ही बाजूने आक्रमण सुरू होतं. शेवटी थोडं लक्ष दुसरीकडे न्यायला म्हणून पश्चिम समेवर लुकलुकत असणारा शुक्र दाखवला अन मग सूर्यमाला वर आमचा विषय आला.कोण कोणते ग्रह, ग्रहण कस होत वगैरे सुरू असताना, आम्हाला शनी दाखवतोस का रे? कुठे ब्र असेल आपण शोधू या का बरं.... थोडक्यात काय तर मी आगीतून फुफाट्यात आलो होतो ...🤣🤣😂😂😂
त्यावर थोडं बोलून झाल्यावर मग अचानक पर्णवी म्हणे,बाबा...अरे तुला एक सांगायचं राहूनच गेलं....आज पहाटे काय झालं माहीत आहे का तुला? मी पहाटे उठले ना तेव्हा आपल्या बेडरूमच्या खिडकी मध्ये कोण आलं होतं ....ओळख बरं?
"आपला तो येलो बंपी वाला पक्षी की कोकिळा"
"छे....नाही...हरलास ना....सांगू तुला....अरे सकाळी कृष्ण बाप्पा अन राधा दोघे आले होते....आणी ते आपल्या खिडकी मध्ये बसून माझ्याकडे बघत होते..."
"हो काय...."
मी पुढे बोलणार तोच लगेच अद्वय म्हणे..."पर्णवी, काही सांगू नकोस, देव बाप्पा आपल्याला कधी दिसुच शकत नाही...म्हणजे तो असतो पण दिसत नाही..."
"अरे आदू, बाप्पा दिसतो आपल्याला....हो की नाही रे बाबा..."
"लहान मुलांना दिसू शकतो...."इति मी
"बर मग कृष्ण बाप्पा काही बोलला का तुझ्या सोबत...काय म्हणाला बाप्पा..."
"अरे बाप्पा सकाळी कधी बोलतो का?...बाप्पा अन राधा फक्त माझ्याकडे बघून हसत होते..."
"पण बाप्पा असा कसा काय तुला दिसला...." इति आदू
मग मध्येच मी दोघांना थांबवत म्हणालो...जे चांगली लोक असतात चांगली वागतात त्यांना दिसतो....
अस म्हणाल्या बरोबर लगेच पर्णवी सुरू झाली...." होय आदू, जे चांगलं वागतात, चांगलं बोलतात, कोणाला त्रास देत नाही त्यांना बाप्पा नेहमी दिसतो. अन तुला माहिती आहे का स्वामी आजोबा नेहमीच आपल्या सोबत असतात फक्त आपल्याला ते तेव्हा दिसत नाही...अन आता सुद्धा ते आपलं बोलणं ऐकत आहेत....त्यामुळे आपण ना नेहमी चांगलंच वागयचं,त्रास द्यायचा नाही म्हणजे मग आपल्याला सोबत असणारा बाप्पा दिसतो......हो की नाही रे बाबा...."
आता इतक्या सोप्या भाषेत जगण्याचा मंत्र सांगितल्यावर मी फक्त हो शिवाय काय बोलणार 🤗
0 Comments:
Post a Comment